ऑन दी स्पॉट : पुणे-मुंबई महामार्गावर बेकायदा प्रवासी वाहतूक!
- वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : नवले ब्रिजच्या धर्तीवर अपघाताचा धोका
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पुणे-मुंबई महामार्गावर मुंबई आणि सातारा-कोल्हापूरच्या दिशेने होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. या महामार्गावरील नवले ब्रिज आणि लोणावळा, खंडळा घाटातील अपघातांची वाढती संख्या पाहता अवैध प्रवासी वाहतूक म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. मात्र, याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस प्रशासनाकडून कारवाईकडे कानाडोळा केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड, भूमकर चौक, ताथवडे, रावेत या गावांना जोडणाऱ्या ठिकाणी मुख्य महामार्गावर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. मुंबईसह सातारा-कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी मुख्य रस्त्यावरच उभे असतात. प्रवासी वाहतूक करणारी वाहने ही प्रवासी वाहतूक परवानाधारक नसतात. खासगी वाहनांमधून आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. प्रवासी मुख्य रस्त्यावर आणि संबंधित वाहनांमुळे ऐन रहदारीच्या वेळी संबंधित चौकात वाहतूक कोंडी होते. परिणामी, सामान्य वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो.
स्पॉट शोधा अन् कारवाई करा…
वाकड ते रावेत या महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होणारे ‘स्पॉट’ तात्काळ निश्चित करावेत. त्याद्वारे स्थानिक पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश द्यावेत. काही दिवसांपूर्वी, नवले ब्रिज येथे भीषण अपघात झाला होता. लोणावळा आणि खंडाळा परिसरातील अपघातांचे सत्र सुरू आहे. तशीच परिस्थिती वाकड ते रावेत या पट्टयात होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
ताथवडे, भूमकर चौकात धोकादायक परिस्थिती…
पुणे-मुंबई महामार्गावरीत ताथवडे ते भूमकर चौक भागात डॉ. डी. वाय. पाटील, जे.एस.पी.एम., इंदिरा इंटरनॅशन स्कूल आदी मोठ्या शिक्षण संस्था आहेत. सकाळच्या सत्रात शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू असते. अशा परिस्थितीत इंदिरा नॅशनल स्कूलच्या समोर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. परिणामी, गुजरात- राजस्थान राज्यात जाणाऱ्या मोठ्या बसेसही रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या असतात. सर्व्हिस रस्ता आणि मुख्य रस्ता बेकायदेशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अरुंद होतो. परिणामी, वाहतूक कोंडी होवून नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.