रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर पतधोरण समितीने आज गुरुवारी (दि. ६ एप्रिल) रेपो दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे जाहीर केले आहे. ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट पूर्वीइतकाच म्हणजे ६.५ % राहणार आहे. यामुळे कर्जदारांना तुर्तास दिलासा मिळाला असून त्यांचा ईएमआयदेखील वाढणार नाही.
तसेच, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय व्यवस्था सुस्थितीत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
रेपो दर म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.