breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराजकारण

राष्ट्रवादीची ‘टीकटीक’ कायम : विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर विजयी

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या एकनाथ खडसे यांचा वनवास अखेर संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २७ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर त्यांचा आवाज पुन्हा विधिमंडळात घुमणार आहे. त्यांच्या पराभवासाठी भाजपने मोठ्या प्रयत्नांची शर्थ केली. परंतु राष्ट्रवादीच्या करेक्ट नियोजनाने खडसेंच्या माथी पहिल्याच फेरीत विजयाचा टिळा लागला. तसेच, ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनीही विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणीला चार तास उशीर झाला. अखेर चार तासांच्या प्रतिक्षेनंतर ९ वाजता निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत तर सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही विजयी गुलाल उधळला. विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, हे आधीपासूनच ठरले होते. त्यामुळे दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजाराची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती.

खडसेंच्या विजयानंतर समर्थकांचा मोठा जल्लोष
एकनाथ खडसे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. असंख्य कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळून खडसेंच्या नावाने गगनभेदी घोषणाबाजी केली. आमच्या नेत्याला भाजपमध्ये छळलं, पण आता राष्ट्रवादीने पानाचं पान दिलं, अशा भावना व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवारांचे खडसे समर्थकांनी आभार मानले.

खडसेंच्या विजयानंतर मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधाळण करत खडसे समर्थकांनी भाऊंचा विजय साजरा केला. शहरात निकाल लागण्याआधीच एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक लागले होते.

खडसे समर्थक इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी विधिमंडळ परिसरात दाखल होत चक्क ‘टरबूज’ नाचवले. राजकीय घडामोडींशी ज्ञात असलेल्या प्रत्येकालाच टरबूज हे टोपणनाव खडसेंच्या कुठल्या राजकीय वैऱ्याला उद्देशून वापरले जाते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

एकनाथ खडसेंच्या विजय, आता उट्ट काढणार?
जळगाव जिल्ह्यात भाजप पक्ष वाढीमध्ये एकनाथ खडसेंचा मोठा वाटा राहिला. यासाठी त्यांनी अनेक वर्ष सातत्याने काम केले. भाजपमध्ये असताना खडसेंनी अनेक खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून विधानभवनही गाजवले आहे. यामुळे एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. मात्र २०१४ साली राज्यात भाजपची सत्ता असताना महसूलमंत्री म्हणून काम करणाऱ्या खडसे यांचे पुण्यातील भोसरी येथील कथित भूखंड घोटाळ्यातनाव आले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीसोबत संभाषणाचाही आरोप खडसेंवर झाला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी राजकीय छळ केल्याचा आरोप खडसे यांनी अनेकदा केला आहे. जळगावमध्ये विविध निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत या सगळ्याचं उट्ट काढण्याचा प्रयत्न आगामी काळात एकनाथ खडसे यांच्याकडून केला जाऊ शकतो.

विधानपरिषदेतील एण्ट्रीनंतर होणार फायदा
एकनाथ खडसे पक्षात आल्यानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले होते. खडसेंच्या पाठोपाठ त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत दाखल झाले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. मात्र राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खडसे विजयानंतर पुन्हा एकदा विधिमंडळात त्यांचा आवाज घुमणार आहे.

मोठं राजकीय आव्हान
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी हा तालुका खडसे यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात असलेल्या बोदवड नगरपंचायतींवर खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला सत्ता मिळालेली नाही. या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या केवळ सहा जागा निवडून आल्या. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अद्याप पाहिजे तेवढा प्रभाव दिसलेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचं शिवधनुष्य खडसे यांना पेलावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button