काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याचा काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट
![Weather, khat, district, rain, yellow alert, Mumbai, heavy rains, forecast,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/pausa-1-780x470.jpg)
मुंबई : पावसाने महाराष्ट्रात वेळेआधीच हजेरी लावली होती. त्यानंतर जवळपास आठवडा दडी मारली होती. यामुळे बळीराजा संकटात आला आहे. मात्र आता पावसाने जवळपास राज्यभरात हजेरी लावली असून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह अनेक भागात मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
मंगळवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारीदेखील अनेक भागात सरी कोसळताना दिसत आहेत. हवामान विभागाकडून पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आला आहे.
२५ जूनपर्यंत मुसळधार पावासाचा अलर्ट
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, १८ जून ते २५ जूनदरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. त्याशिवाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ ते ४ दिवसांत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस होईल. तसंच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार असून संपूर्ण महाराष्ट्रभरात सरी कोसळणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रातील या भागात होणार मुसळधार पाऊस
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, अकोला, गोंदिया, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय मराठवाड्यात जालना, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस होणार आहे.
कोल्हापुरात धुवांधार पाऊस
उत्तर महाराष्टारातील नाशिक, धुळे, सोलापूर, जळगावात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रभरात चांगला पाऊस होणार असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आला होता, मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता मात्र पुन्हा एकदा शेतीच्या कामांना वेग येईल.