एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटं दाखविण्याचा हा काळ नाही- मोहन भागवत
![Team meeting for Uttar Pradesh; Sarsanghchalak Mohan Bhagwat was also present](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/MOHAN-BHAGWAT-RSS-1.jpg)
मुंबई – कोरोना महामारीने देशभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे सर्वत्र नकारात्मकतेचं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊनमध्ये नागरिक बेजाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यावरून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं आहे. कोरोना महासाथीची दुसरी लाट येत असल्याचा इशारा मिळूनही आपण सर्वांनी बेपर्वाई, निष्काळजीपणा दाखवला, त्यामुळे देशाला आज मोठ्या आरोग्य संकटाला सामोरं जावं लागत असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, पण घाबरण्याचं कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेनं या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही, असं मोहन भागवत म्हणाले.
विन्स्टन चर्चिल यांच्या टेबलावर एक वाक्य लिहिलेलं असायचं. या कार्यालयात कोणताही निराशावाद नाही. पराभवाच्या शक्यतेबद्दल कोणतीही उत्सुकता नाही. कारण त्याचं अस्तित्वच नाही, असं म्हणत भागवत यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा उल्लेख केला.
दरम्यान, आपण घाबरत आहोत का? तिसरी लाट आलीच तर लाटा आदळणाऱ्या एखाद्या खडकासारखं आपण सज्ज असलं पाहिजे, असं देखील ते यावेळी म्हणाले. सकारात्मकता, धैर्य, संघटित शक्तीने कोरोना संकटाचा मुकाबला करून आपण जगासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण ठेवू, असं देखील ते यावेळी म्हणाले.