कल्याण-डोंबिवलीत आजपासून कठोर निर्बंध
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
कल्याण – कल्याण-डोंबिवलीत वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. आज, ११ मार्चपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेल, दुकाने, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्यासाठीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. तसेच लग्न समारंभांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांना सोसायटीच्या आवाराबाहेर फिरू न देण्यासंदर्भात सोसायट्यांनादेखील पालिकेकडून निर्देश देण्यात आले आहेत.
वाचा :-राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
कल्याण-डोंबिवलीत बुधवारी आलेली कोरोना रुग्णसंख्या प्रशासनासोबतच आरोग्य यंत्रणेसाठीदेखील चिंतेची बाब ठरली. २४ तासांत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात तब्बल ३९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच ३०० हून अधिक कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वच यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावून कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले.
काय आहेत निर्बध?
१. दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी असेल. अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे.
२. शनिवार आणि रविवारी पी-१ आणि पी-२ या व्यवस्थेनुसार दुकाने सुरू ठेवली जातील.
३. खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गाड्यांनादेखील संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी असेल.
४. भाजीमंडई ५० टक्के क्षमतेनेच चालवल्या जातील.
५. लग्न आणि हळदी समारंभांवर कडक निर्बंध असतील. अशा कार्यक्रमांमध्ये ५० लोकांच्या संख्येचे उल्लंघन करू नये. या समारंभांसाठी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतची वेळ ठरविण्यात आली आहे.
६. अशा कार्यक्रमांत उल्लंघन झाले, तर वधू-वराच्या माता-पित्यांविरोधात आणि मंगल कार्यालयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.
७. आठवडी बाजारांवरदेखील निर्बंध असतील.
८. बार आणि हॉटेल्ससाठी रात्री ११ ऐवजी ९ वाजेपर्यंतचीच वेळ ठरवण्यात आली आहे.
९. होम डिलिव्हरीसाठी रात्री १० वाजेपर्यंत मुभा असेल.
१०. पोळी-भाजी केंद्रदेखील रात्री ९ पर्यंतच सुरू राहतील.
११. महाशिवरात्रीसाठी कल्याण-डोंबिवलीतील ६२ मंदिरे फक्त पूजेसाठी उघडले जातील, दर्शनासाठी मंदिरे बंद राहतील.
१२. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य असेल.
१३. होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोनाबाधित फिरताना आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
१४. होम आयसोलेशनसाठी घरात जागा असणाऱ्यांनाच होम आयसोलेशनी परवानगी असेल.