‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुढे आलेले ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी अखेर मोठ्या राजकीय नाट्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विरोधकांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली होती.भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका करत वन मंत्री संजय राठोड अजूनही मंत्रीपदावर असल्याचा आरोप केला आहे. संजय राठोड यांनी आपल्या वन मंत्री पदाचा राजीनामा देऊन 3 दिवस उलटले असून अद्याप त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला नाही.
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिलेला राजीनामा ही केवळ जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक होती. कारण, राजीनामा दिल्यानंतर 3 दिवस झाले तरी अजून राज्यपालांकडे तो दिलेला नाही. राज्यपाल जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करत नाहीत तोपर्यंत संजय राठोड हे मंत्री आहेत. त्यामुळे, या संदर्भात “वाण नाही पण गुण लागला” हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका असं ट्विट चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलं आहे.
भाजप आमदार संजय कुटे यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वनमंत्री यांचा राजीनामा केवळ दिखावा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सेना भवन किंवा मातोश्रीमध्ये तो राजीनामा फ्रेम करून ठेवला आहे. असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.





