मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचा हिंदी भाषेवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात
अभिजात दर्जा मिळायला अजून बाराशे वर्षे बाकी
मीरा भायंदर : हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर मराठी लोकांचा मोर्चा निघाला. आता राज ठाकरे यांची शुक्रवारी रात्री मीरा भाईंदरमध्ये सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी हिंदी भाषेवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात केला.
राज ठाकरे म्हणाले की, कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठीत सांगावं लागेल. मीरा भाईंदरमध्ये घडलेला प्रसंग छोटा होता. हिंदी सक्तीचा मोर्चा सुरु होता त्यात व्यापाऱ्याने विरोध केला. त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद करायची गरज नव्हती. तुम्हाला काय वाटतं, मराठी व्यापारी नाहीत. आम्ही काही घेतलं नाही तर तुमचं दुकान चालेल ना? महाराष्ट्रामध्ये राहताय तर मराठी शिका, शांतपणे राहा. पण इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार.
”हिंदी भाषेच्या सक्तीमुळे हे सगळं सुरु झालं. राज्याचे मुख्यमंत्री काल म्हणाले की, हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. राज्य सरकारला अशी आत्महत्या करणार असेल तर बिनधास्त करावी. त्या दिवशीच्या फक्त मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न करुन तर बघा, दुकानं नाही तर शाळा बंद करीन. इतर शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे, ते सोडून मुख्यमंत्री हिंदी सक्तीच्या मागे लागलेले आहेत.” असं राज म्हणाले.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची काय अवस्था झालीय?’ विधीमंडळातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी पहिल्यांदा बोलले ते वल्लभभाई पटेल. ज्यांना आम्ही आदराने बघत आलोत त्यांनीच महाराष्ट्राला विरोध केला होता. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आंदोलने झाले त्यावेळी हिंसा झालेली आहे. मोरारजी देसाई यांनी गोळीबार करुन मराठी माणसांना मारलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरुय. हे लोक तुम्हाला तपासून बघत आहेत. मराठी माणूस पेटतोय का, हे ते बघतात. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि ती गुजरातला द्यायची, हे या लोकांचं स्वप्न आहे. तुमची भाषा आणि पायाखालची जमीन केली की तुमची किंमत शून्य असते. त्यामुळे भाषा आणि जागा टिकवणं महत्त्वाचं आहे.
हिंदी चॅनेलवाल्यांवर संताप
हिंदी चॅनेलवाले हे सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालचे ढेकणं आहेत. मुंबईत आणि महाराष्ट्रात काहीही झालं तरी हे लोक कोणाच्या सांगण्यावरुन आणि स्वतःच्या रागातून पेटून उठतात.
२८ सप्टेंबर २०१८ गुजरातमध्ये बलात्काराची घटना घडली तेव्हा २० हजार बिहारी लोकांना राज्यातून बाहेर काढलं, तेव्हा बातम्या झाल्या का?
यांच्या राज्यात ते वाट्टेल तसं करणार बाहेरच्या लोकांना हाकलून देणार, दुसऱ्याच्या राज्यात येणार.. एका मिठाईवाल्याच्या कानफटात मारली तर देशाची बातमी कशी होते? हे काय प्रकारचं राजकारण सुरुय, हे मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे.
हिंदी भाषेचा इतिहास
हिंदी भाषेला २०० वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी १४०० वर्षांचा इतिहास असावा लागतो. हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे बाकी आहेत. हिंदीने २५० पेक्षा जास्त भाषा मारुन टाकल्या आहेत. त्यामुळे ही भाषा आम्ही महाराष्ट्रात सक्तीची होऊ देणार नाही.





