रिक्षाचालकांसाठी खूशखबर; कागदपत्रांशिवाय असे मिळणार दीड हजार रुपये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/RIKSHAW.jpg)
मुंबई – कोरोना संकटकाळात रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘आयसीआयसीआय’बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 22 मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून सुरु होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.
रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद करायची आहे. यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होईल. तसेच आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाणार आहे.