शिवाजी पार्कवरुन सेना-मनसे यांच्यात जुंपली
![From Shivaji Park between Sena-MNS](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Shivsena-MNS.jpg)
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणुक जसजशी जवळ येत चालली आहे, तसं मुंबईच्या दोन भावंडं पक्षांच्यात असलेली धुसफूस वाढत चालली आहे. ही दोन भावंडं म्हणजे ‘शिवसेना’ व ‘मनसे’. राजकारणाच्या मैदानात एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या या पक्षांनी, आता शिवाजी पार्क मैदानाच्या विकास प्रकल्पावरुन एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्कच्या शिवसेना-मनेसेत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
वाचा :-मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या होण्याची शक्यता
दरम्यान, याला कारणीभूत ठरलंय राज ठाकरे याचं पत्र. त्यांनी आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र देऊन, शिवाजी पार्क नुतनीकरण प्रकल्पासाठी निविदा काढू नये, अशी मागणी केली आहे. तसेच, ही निवीदा प्रक्रियाही तातडीने थांबवावी, असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी पार्क प्रकल्पाचा खर्च महापालिकेकडून न करता सिएसआर फंडातून करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीदेखील त्यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
यावर शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेवर मनसे डल्ला मारत असल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी मनसेचा नगरसेवक होता, त्यावेळी सीएसआर फंडातून शिवाजी पार्कसाठी ४० लाखांचा खर्च का केला नाही, असा सवालदेखील शिवसेनेनं यावेळी विचारला आहे. निविदा प्रक्रिया तातडीने थांबवावी, या राज ठाकरे यांनी पत्रात लिहिलेल्या विनंतीवर, निविदेची जाहिरात आधीच आली असून ही प्रक्रीया आता रद्द होणार नाही, असं उत्तर शिवसेनेनं दिले आहे. त्यामुळे निवडणूक जसजशी जवळ येईल तसा हा संघर्ष अजून पेटण्याची शक्यता आहे.