राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका मातोश्रीवर कॅमेरे लागतीआधीच म्हटलं होतं
मुंबई | गृहमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यशैलीवर शिवसेना नाराज आहे. गृहमंत्र्यांवरची नाराजी मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात बोलून दाखवली होती. आजही याच पार्श्वभूमीवर वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असं सगळं असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी वेगळंच विधान केलं आहे. “महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना मी उद्धवजींना आधीच सांगितलं होतं, गृहमंत्रिपद तुमच्याकडे ठेवा, नाहीतर राष्ट्रवादी असा पक्ष आहे, जे तुमचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर कॅमेरे लावतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये गृहमंत्रिपदावरुन चाललेल्या हमरीतुमरीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी अडीज वर्ष मागील जुना संदर्भ देताना मी त्याचवेळी उद्धवजींना लाखमोलाचा सल्ला दिला होता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“महाविकास आघाडी सरकार तयार झाल्यानंतर लगोलग मी उद्धवजींना सांगितलं होतं, की उद्धवजी, किमान गृहखातं दुसरं कुणाला देऊ नका. ते तुमच्याकडे ठेवा. त्याचं कारण राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की, मातोश्रीवर देखील ते कॅमेरे लावतील. पण मी केलेल्या विधानाची त्यावेळी चेष्टा केली गेली. पण आजची परिस्थिती पाहिल्यानंतर माझं त्यावेळचं विधान शिवसेना आणि उद्धवजींच्या लक्षात येईन”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“राष्ट्रवादी हा पक्ष स्वार्थापायी कुणालाही बरोबर घ्यायला तयार असतो किंबहुना जायला तयार असतो तुम्ही त्यांचा इतिहास काढून बघा”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली.