शिवडी सागरी सेतूची द्रुतगती महामार्गाशी जोड!
![connect-shivdi-sea-bridge-to-expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/highway.jpg)
मुंबई | मुंबई ते पुणे प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. कारण मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-.न्हावाशेवा सागरी सेतू आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.त्यानुसार चिरले ते खालापूर असा रस्ता बांधण्यात येणार आहे. याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएने शुक्रवारी निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी करत हा प्रवास वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून मुंबई पारबंदर (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) प्रकल्प राबविला जात आहे. २१.८ किमीच्या सागरी मार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा सागरी सेतू सुरू झाल्यास काही मिनिटांत नवी मुंबईला पोहोचता येणार आहे. सागरी सेतूला पोहचणे सोपे व्हावे यासाठी वरळी ते शिवडी असा रस्ता बांधला जात आहे. वरळीवरून शिवडी सागरी सेतूवर येत वेगाने नवी मुंबईत पोहचता येणार आहे.
सागरी सेतूवरून पुढे नवी मुंबईतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागणार आहे. चिरले ते खालापूर हे अंतर बरेच असणार आहे. त्यामुळे चिरलेवरून द्रुतगती मार्गावर पोहचता यावे यासाठी सागरी सेतू द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार चिरले ते खालापूर असा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी बराच काळ लागणार आहे. मात्र हा रस्ता झाल्यास वरळीवरून थेट खालापूर टोलनाक्यावर पोहचता येणार आहे.
डोंगर फोडून ६.५ किमीचा रस्ता
सागरी सेतू द्रुतगती महामार्गाशी जोडण्यासाठी चिरले ते खालापूर रस्ता बांधण्यात येणार आहे. हा एकूण रस्ता ६.५ किमीचा असणार आहे. यातील १.५ किमीचा रस्ता पूर्णत: नवीन असणार असून हा एमएमआरडीए बांधणार आहे. चिरलेपासून काही अंतरावर एक डोंगर आहे. हा डोंगर फोडून त्यातून रस्ता नेण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.