“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब-माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरु दे दारोदारी”
![BJP spokesperson Keshav Upadhyay has hurled insults at the Chief Minister, saying that the Chief Minister's administration is running heavy, my family-my responsibility, all the rest is Firu De Darodaari. He also pointed out the dissatisfaction in the Mahavikas front, saying,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/udhav-thakare.jpg)
अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय
मुंबई : मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी चाललाय, माझे कुटुंब-माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरु दे दारोदारी, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय. तसंच महाविकास आघाडीतल्या असंतोषावर बोट ठेवताना, “धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था सेना-काँग्रेसची झाली आहे”, असं म्हटलंय.
राज्यात केवळ मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे पण सरकारमध्ये जास्त अधिकार मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आहेत. महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त वजनही राष्ट्रवादीचं आहे, अशा चर्चा सातत्याने होत असतात. हाच धागा पकडून केशव उपाध्ये यांनी सेनेला आणि काँग्रेसला डिवचलं आहे.
केशव उपाध्ये यांनी काय म्हटलंय?
“महाविकास आघाडीत काँग्रेसचे २५ आमदार नाराज, शिवसेनेचेही २५ आमदार नाराज, मग उरलं कोण? आतापर्यंत मविआवर जर कुणी नाराज नसेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस. मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना आमदारांना कुणी विचारत नाही. सत्ता नसली तर काँग्रेस टिकणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, गृहनिर्माणसारखी खाती असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय. धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था सेना-काँग्रेसची झाली आहे.”
“जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार? मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी चाललाय, माझे कुटुंब (मुलगा, मेव्हुणा) माझी जबाबदारी, बाकीसगळे फिरू दे दारोदारी”, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय तर काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.