सुमारे ४०० करोनायोद्धय़ांना कार्यमुक्त करणार
नवी मुंबई | करोना काळात आरोग्य सुविधा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून डॉक्टर तसेच विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांची भरती नवी मुंबई पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात केली होती. त्यापैकी ४०० ते ४५० करोना योद्धय़ांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया आठवडाभरात केली जाणार आहे.
नवी मुंबई शहरात करोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. त्या वेळी संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीच्या काळात पालिकेच्या तोकडय़ा आरोग्य सुविधेचे चित्र समोर आले होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्था पुरवण्यासाठी करोनाकाळात पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबवून १९११ जणांची तात्पुरती भरती केली होती. दुसऱ्या लाटेनंतर करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने या तात्पुरत्या करोनायोद्धय़ांना पालिकेने कमी करण्याची तयारी केली होती. परंतु पुन्हा तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने तात्पुरत्या करोनायोद्धय़ांची सेवा वाढवण्यात आली होती. परंतु तिसरी लाट कमी झाल्याने पालिकेने पहिल्या टप्प्यात ८३७ तात्पुरत्या करोना योद्धय़ांना कार्यमुक्त केले होते. तर आता दुसऱ्या टप्प्यात १०७४ पैकी जळजवळ ४०० ते ४५० जणांना कमी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
तिसऱ्या लाटेनंतर करोनास्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याने तात्पुरत्या स्वरूपातील अनेक करोना योद्धय़ांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून आवश्यकतेनुसार या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहे. शहरात मार्च २०२० मध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेच्या वाशी रुग्णालयात करोना उपचार सुरू झाले होते. त्यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे जम्बो करोना उपचार केंद्र सुरू केले होते. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी करोना काळजी केंद्रे निर्माण केली होती.
पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट मोठी होती तर तिसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या झाली होती. तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही तिसऱ्या लाटेत कित्येक पटीत वाढलेली होती. परंतु आता स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. आरोग्य व्यवस्था कर्मचारी व डॉक्टर यांच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्यांना यापुढेही कमी केले जाणार असल्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील १९११ जणांपैकी ८३७ जणांना पहिल्या टप्प्यात कार्यमुक्त केले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ४०० ते ४५० जणांना कमी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
पालिकेने करोना काळात मोठय़ा प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया केली होती. परंतु सद्य:स्थितीत आवश्यकतेनुसार कर्मचारी, डॉक्टर यांना ठेवून अतिरिक्त डॉक्टर तसेच विविध पदांवरील तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी यांना कमी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आठशेपेक्षा अधिक जणांना कमी करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात अंदाजे ४०० ते ४५० जणांना कमी करण्यात येणार आहे.





