20 तासांत 610 रुग्णांनी दिला कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा
मुंबई | देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 20 तासांमध्ये कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असला तरीही दिलासा देणारी बाब म्हणजे 610 जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. सध्या देशात 15 हजार 474 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात एकूण 19 हजार 984 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दिलासा देणारी बाब म्हणजे त्यापैकी 3 हजार 869 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. त्यांच्यावरील उपचारांना यश मिळालं असून या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर हॉटस्पॉट असणाऱ्या अनेक शहरांमध्ये प्रशासनाकडून कठोर नियम पाळले जात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तेलंगणानं 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर दुसरीकडे दिल्ली-नोएडा सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे.