‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणी त्वरित खुलासा द्यावा – गृहमंत्री अनिल देशमुख
![Sanjay Rathore will be questioned as per rules, testimony of Anil Deshmukh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1591867918989_anil_deshmukh.jpg)
सीबीआयवर निशाणा साधला
पिंपरी | टीम ऑनलाईन
सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे सीबीआयनं स्पष्ट करावे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत गृहमंत्री देशमुख यांनी हि मागणी केली. सुशांत केसवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सीबीआयवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सीबीआयनं लवकरात लवकर या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. राज्याचा गृहमंत्री म्हणून मला सतत लोक हेच विचारतात. महाराष्ट्रातले लोक तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट बघत आहेत. कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो अशी लोक वाट पाहत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं.
त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा.”नागपूर हे गृहमंत्र्याचे शहर असून देखील या शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात असा नेहमी आरोप केला जातोय. आता या शहरात गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. अनिल देशमुख म्हणाले की, “नागपूरमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये कमी आली आहे.”