संदीप देशपांडेंकडून लोकल प्रवास, तर अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sandip.jpg)
मुंबई – ‘सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा’, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानुसार त्यांनी आज सकाळीच लोकलमधून प्रवास केला आहे. त्यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला. तर दुसरीकडे ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘आम्ही लोकल सुरू करा, अशी विनंती राज्य सरकारकडे अनेकवेळा केली. आजही आमची ती हात जोडून विनंतीच आहे. आम्हाला आंदोलन वैगरे करायचे नाही. मात्र सर्वसामान्यांचे हाल पाहावत नाहीत. चाकरमान्यांना ८ तासांच्या ड्युटीसाठी सहा सहा तास प्रवास करावा लागतो. यात त्यांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे जनतेच्या वतीने आम्ही सविनय कायदेभंगाची हाक दिली होती. त्यानुसार आज रेल्वे प्रवास केलेला आहे. तो कुठून ते कुठपर्यंत केला हे पोलिसांनी शोधावे आणि त्यावर होणाऱ्या कायदेशीर कारवाईस आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत’, अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप देशपांडे यांनी दिली.
तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळत आहे. अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना रेल्वे प्रवास करू द्यावा, अशी तीन वेळा हात जोडून विनंती केली. ‘मला पाच मिनिटं द्या, मी रेल्वेतून प्रवास करतो. त्यानंतर माझ्यावर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो करा’, अशी विनंती अविनाश जाधव पोलिसांना करत आहेत. मात्र अद्याप पोलिसांकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यावर ‘वेळ लागेल पण प्रवास होणार…मी रेल्वेतून प्रवास करणार’, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. तसेच परवानगी दिली नाही, तर गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकांबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.