शेअर बाजारात बल्ले बल्ले, सेन्सेक्स ४० हजारावर!
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात झाली आहे. शेअर मार्केट सुरू होताच सुरुवातीच्या दोन मिनिटातच सेन्सेक्सने ४० हजाराचा आकडा गाठला. तर निफ्टीने १२ हजाराचा टप्पा गाठला आहे.
४ जून रोजी सेन्सेक्स ४० हजार ३१२ वर पोहोचला होता. त्यामुळे आज अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज जाणकार वर्तवत आहेत. आज सकाळी शेअर बाजार खुलताच बँकिंग सेक्टरच्या शेअरमध्ये झपाट्याने वाढ झाली. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये एक टक्क्याने वाढ झाली तर कोटक बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि एसबीआय बँकेचे शेअरही वरच्या स्तरावर पोहोचले होते. निफ्टीच्या ५० पैकी ३३ शेअरचे भाव वाढले आहेत, तर १७ शेअरचे भाव कोसळले आहेत.
मोदी सरकार नव्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने दूर करण्यावर भर देईल, असं देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांना वाटत असल्यानेच शेअर बाजाराने उसळी खाल्ल्याचं बोललं जातयं.