मुंबईतली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात; रिकव्हरी रेट चक्क 81 टक्क्यांवर
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची सर्वांत जास्त संख्या बघायला मिळाली तर ती मुंबईमध्ये. पण आताचा मुंबईतला आकडा पाहिला तर सर्वांत समाधानकारक आकडा पहायला मिळत आहे.दोन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येने संपूर्ण देशाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईने कमाल केली आहे. ट्रेसिंग आणि उपचार या धोरणामुळे मुंबईतील मृत्यू दर तर कमी झाला आहेच, पण रिकव्हरी रेटही वाढला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट आता ८१ टक्क्यांवर गेला आहे.मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर वाढून तो ७६ टक्क्यांहून ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही कमी होऊन ८७ दिवसांवर आला आहे.
मुंबईत ३१ जुलै रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७६ होती. हा सरासरी दर आता ८१ टक्क्यांवर आला आहे. सद्यस्थितीत मुंबईत दररोज हजार ते १२०० रुग्ण आढळत आहेत. पण त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. गेल्या २४ दिवसांत चाचण्यांचे प्रमाण दोन लाखांनी वाढले आहे. ३१ जुलैपर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ चाचण्या करण्यात आल्या. तर, २४ ऑगस्टपर्यंत ही संख्या ७ लाख ९ हजार ५८३पर्यंत पोहोचल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते.
मुंबईत रोज १ हजार ते १२०० रुग्ण आढळत असले तरी बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. करोना कोविड सेंटर, पालिकेसह खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटा यामुळे करोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे.