पार्थ पवारांच्या ‘या’ मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या चर्चा
![पंढरपूर मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/parth-pawar-3-1.jpg)
कार्यकर्त्यांची वाढली मागणी ; नेत्यांची चुप्पी
पिंपरी । प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्तेही त्याबाबत आग्रह धरत आहेत. तर भालके यांच्या पुत्राबाबत अद्याप स्पष्ट भुमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे पार्थ पवारांची पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याबाबत चर्चा जोर धरु लागली आहे.
राष्ट्रवादीचे फायर ब्रँड आमदार म्हणून ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा राहणार या बाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवा, अजित पवार, तिथले पालकमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेतात. तिथे असलेल्या लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल असा मला विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले की, परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कुणी अशी मागणी केली म्हणून लगेच ती पूर्ण होईल असं होत नाही, असं देखील रोहित पवार म्हणाले.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भालकेंची उर्वरित टर्ममध्ये त्यांची राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी हा पर्यायावर विचार सुरू झाला आहे. भारत भालके हे थेट जनतेचे आमदार म्हणून जशी त्यांची ओळख होती. तसे त्यांनी त्यांचा वारसदार ही तयार केलेला नव्हता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक प्रश्न तयार झाले असून त्यांच्या ताब्यात असलेला विठ्ठल कारखानाही आधी अडचणीतून बाहेर काढावा लागेल, असे स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार भालके यांचे पुत्र भगीरथ यांना नुकतेच भालकेंच्या जागी कारखान्याचे अध्यक्ष केले आहे.
पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ यांना उमेदवारी दिली तर विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक व उद्योगपती समाधान वाटाडे यांच्यातील एकासोबत लढत होऊ शकेल. जनतेची सहानुभूती जरी भगीरथ यांच्यासोबत असली तरी अनुभव नसल्याने पक्ष धोका पत्करू शकत नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी उमेदवारी बाबत वक्तव्य करणे टाळत संभ्रम ठेवला आहे.