पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील पावसाळी परिस्थितीची पाहणी
मुंबई : पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. सकाळपासून मुंबई-ठाण्यात असलेला पावसाचा जोर दुपारी ओसरला.
पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आदित्य ठाकरे यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू यांच्यासह महापालिकेचे संबंधित ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
संध्याकाळी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांनी घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
मिठी नदी परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मुंबईत भूस्खलन झालेल्या दोन ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात आला आहे, असेही चहल यांनी सांगितले.
इक्बाल सिंह चहल यांच्याकडून मिठी नदीलगत असणाऱ्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर भागाची पाहणी करण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.





