धारावीत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 च्या वर, तर 5 मृत्यू, सोमवारी आणखी 4 नव्या रुग्णांची नोंद
मुंबईतील सर्वाधिक झोपडपट्टी असलेल्या धारावीला कोरोनाने चांगलाच विळखा घातला आहे. आतापर्यंत इथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ४७ वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी धारावीत ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे धारावीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५ वर पोहोचली आहे अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
तर रविवारी दिवसाअखेरपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. रविवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुण्यातील ३, नवी मुंबईतील २ आणि सोलापूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये १३ पुरुष तर ९ महिला आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार होता मात्र सद्य परिस्थिती पाहता गेल्याच आठवड्यात राज्यात लॉकडाऊनचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मोदी सरकार देशाला तीन झोनमध्ये विभागण्याची शक्यता आहे.कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे. झोनमध्ये विभागणी करुन सरकार काही सूट देऊ शकते.