“देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही”
मुंबई | राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
खाते वाटपासंदर्भात आघाडीच्या तिन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटतात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.”