TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ठाणे जिल्ह्याची हवा खराब; गुणवत्ता निर्देशांक घातक पातळीवर

मुंबई, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब म्हणजे श्वसनास अयोग्य आहे. खराब हवेमुळे सर्दी- खोकला आणि घसादुखीच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ होती. मात्र ‘सफर’ संकेतस्थळाच्या शुक्रवारच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता ‘सामान्य’ स्थितीत आहे. मालाड वगळता इतर सर्व ठिकाणी धुलीकणांचे प्रमाण कमी झाले आहे.

महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेची गुणवत्ता तपासण्यात येते. गेल्या काही आठवडय़ांत केलेल्या हवेच्या गुणवत्ता तपासणीतून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची हवा प्रदूषित असल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीबरोबरच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या लहान शहरांच्या निवासी भागांतील हवासुद्धा प्रदूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रदूषण रोखण्याबाबतची कारखान्यांची उदासीनता आणि वाहतूक कोंडीत मुंगीच्या गतीने चालणारी वाहने यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील हवा श्वसनास अयोग्य बनल्याचे तपासणीत आढळले.  

कल्याण आणि डोंबिवली येथील हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी १७८ इतका होता. ठाण्यातील काही निवासी भागात हा निर्देशांक सुमारे ७०, तर तीन हात नाका परिसरात १०२ इतका होता. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ताच तपासली जात नसल्याचे उघड झाले आहे. परंतु या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्री रासायनिक वायूची दरुगधी पसरत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.   कल्याण शहरातील रहिवासी भागात बुधवारी प्रदूषित हवेचा निर्देशांक १७८ इतका नोंदवण्यात आला. तो जिल्ह्यात सर्वाधिक आहे. ठाणे शहरातील औद्योगिक क्षेत्रात हा निर्देशांक ५६ आणि दुकाने आणि आस्थापनांच्या परिसरात तो ६९ इतका नोंदविण्यात आला आहे. कल्याण आणि डोंबिवली शहरातील औद्योगिक क्षेत्रात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा ११४ इतका नोंदविण्यात आला होता. विशेष म्हणजे कोंडीची ठिकाणे, विस्तारीत भाग, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांत मात्र हवा निर्देशांक नोंदवण्यात येत नाही.

अंबरनाथ शहरात अलिकडची शेवटची हवा गुणवत्ता तपासणी २८ सप्टेंबरला करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्देशांक १११ होता. बदलापुरातील शेवटची नोंद १८ सप्टेंबरची असून त्यात निर्देशांक १२९ होता. तर उल्हासनगरातील शेवटची नोंद २८ जूनची आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांतील हवा श्वसनास योग्य नसल्याचे आढळले.

अद्ययावत नोंद नाहीच

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये वायू प्रदुषणाच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रात्री औद्योगिक क्षेत्रातून रासायनिक वायू सोडला जात असल्याने दरुगधी पसरते. मात्र त्याची अद्ययावत माहितीच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे नाही. उल्हासनगरात सीएचएम महाविद्यालय, अंबरनाथमध्ये पालिका मुख्यालय, बदलापुरात ‘बिवा’ या कारखानदारांच्या संघटनेच्या  कार्यलयात हवा गुणवत्ता तपासणीची यंत्रणा असल्याची माहिती कल्याणचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बी. एम. कुकडे यांनी दिली. 

वाहने आणि कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे वायू अत्यंत घातक असतात. त्यांचे हवेतील प्रमाण वाढल्याने हवा प्रदूषित झाली आहे. परिणामी, नागरिकांना दमा, खोकला, घसादुखी आदी आजारांचा त्रास होत आहे. प्रदूषित हवेचा थेट परिणाम फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे नागरिकांचे आयुष्यमान कमी होते. 

– डॉ. भिमराव जाधव, ठाणे

हवा निर्देशांक काय सांगतो?

० ते ५० श्वसनास योग्य

५० ते १०० त्रास असलेल्यांसाठी अयोग्य

१०० ते २०० बालके, अस्थमा आणि हृदयरुग्णांसाठी घातक

भाग हवा गुणवत्ता

    निर्देशांक

कल्याण-डोंबिवली     १७८

ठाण्यातील काही निवासी भाग ७०

ठाणे तीन हात नाका परिसर   १०२

मुंबईत सर्दी-खोकल्याच्या रुग्णांत वाढ

मुंबई : मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारत असला तरी मुंबईकर सर्दी, खोकला आणि घसादुखीने हैराण आहेत. वातावरणातील बदलामुळे घसा संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली. महापालिका रुग्णालयांच्या कान-नाक-घसा विभागांमध्ये येणाऱ्या दैनंदिन रुग्णांमध्येही ५० टक्के वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button