“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करा”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/maharaj-mumbai-Frame-copy-3.jpg)
महाईन्यूज | मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आलेली असून त्यासंदर्भातील पत्र त्यांना मिळालं आहे. त्यात राज्याच्या मुख्य सचिवांनी या संदर्भातील माहिती द्यावी तसेच हा अहवाल पोर्टलवर टाकावा असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, “सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्व गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करावी अशी तक्रार दिली होती.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलं असून यात राज्याच्या मुख्य सचिवांनी या संदर्भातील माहिती द्यावी असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच हा अहवाल पोर्टलवर टाकावा असंदेखील पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे.” दरम्यान, लवकरात लवकर पुढील कारवाई होऊन चौकशी करण्यात येईल आणि संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा मारुती भापकर यांनी व्यक्त केली आहे.पुढे ते म्हणाले, “मुंबई मधील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कार्यन्वित केला. या संदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ३ हजार ८०० कोटी पेक्षा जास्त होती रकमेची ती निविदा होती. मात्र ठेकेदाराला काम देण्यात आल्यानंतर वाटाघाटी करून ही रक्कम अडीच हजार कोटींची झाली असं दाखवण्यात आलं. तसंच स्मारकाची १२१.२ मीटरची उंची होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ८३.२ मीटर उंचीचा होता. तो ७३.२ इतका कमी उंचीचा करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आहे ती कमी उंचीची असताना अधिक उंचीची करण्यात आली आहे,” अस भापकर म्हणाले आहेत.