औरंगाबादमध्ये 577 तर विरार परिसरात 181 मंडळांचा गणेशोत्सव रद्द;प्रशासनाला साथ देत घेतला निर्णय
![Ganoshotsav: Rules for entry in Ratnagiri district announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Ganesh-Chaturthi-OR-Vinayaka-Chaturthi.jpg)
मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांकडूनही स्वागतार्ह पाऊल उचलले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत गणेश मंडळांनी खबरदारी म्हणून गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबादमध्ये तब्बल 577 गणेश मंडळांनी तर वसईमध्ये 181 गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादमध्ये सार्वजनिक गणपती मंडळांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. या अंतर्गत 577 गणपती मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा घेतला निर्णय आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या आवाहनाला 577 मंडळांनी प्रतिसाद दिला. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला.
आनंदाचा उत्सव असणाऱ्या गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून या 577 मंडळांनी इतर गणेश मंडळांसमोर आदर्श घालून दिला. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात फक्त 137 मंडळं गणेशोत्सव साजरा करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व जागरुकता दाखवत नवा पायंडा पाडला आहे.
वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आवाहनाला गणेशमंडळांची चांगलीच साथ मिळाली आहे. 736 सार्वजनिक गणेश मंडळांपैकी 181 गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव रद्द केलाय. या व्यतिरिक्त 53 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घरगुती गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 555 गणेश मंडळं सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विभागातील 7 पोलीस ठाणे, 3 डीवायएसपी (DYSP) कार्यालय आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील यंदाचा गणेशोत्सव रद्द करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव रद्द करुन 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.