अर्णब गोस्वामी अलिबाग न्यायालयासमोर हजर, सुनावणी सुरू
मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. या कारवाईनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अलिबाग न्यायालयात हजर केले असून याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायालय अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी सुनावणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. त्यावेळी त्यांनी तब्बल दीड तास पोलिसांशी हुज्जत घातली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरात घुसूच दिले नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. मात्र अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन अलिबागला रवाना झाले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.