खासदार नुसरत जहाँ यांच्या लग्नाचा वाद संसदेत पोहोचला
नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या लग्नाचा वाद आता थेट संसदेत पोहोचला आहे. भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत मोठी मागणी केली आहे. मौर्य यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत जहाँ यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नुसरत जहाँ यांनी काही दिवसांपूर्वी ७ मुद्द्यांचे निवेदन काढले होते. त्यात त्यांनी ‘निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता’, असा खुलासा केला होता. तसेच हा विवाह तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे, असेदेखील त्या म्हणाल्या होत्या. यावर भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी ‘नुसरत जहाँ यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी असून त्यांनी लग्नाचा विषय आपल्या मतदारांपासून लपवून ठेवला. त्यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेवरही धूळ उडाली आहे. हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात यावे. याची चौकशी करून नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
तसेच ‘लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत जहाँ पहिल्या दिवशी सभागृहात नवरीप्रमाणे तयार होऊन आल्या होत्या. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा नुसरत जहाँ यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या’, असा उल्लेखही मौर्य यांनी केला आहे.