सरकारने दिलेलं आरक्षण टिकेल का? मनोज जरांगेंकडून शंका व्यक्त
आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil | विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विधेयकावर शंका व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, याआधी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत केले होते. आताही १०० ते १५० जणांसाठी लागू होत असलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागतच करत आहोत. पण कोट्यवधी मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी प्रवर्गातील आरक्षण आम्हाला हवे आहे. मराठा समाजात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, त्या बांधवांसाठी सगोसोयऱ्यांबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. आम्हाला जे हवंय ते आम्ही मिळवणारच. आम्ही उद्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत.
हेही वाचा – ‘ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण’; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
मी सांगितले होते की सध्या लागू करण्यात आलेल्या आरक्षणाला नाकारण्याचे काही कारणच नाही. पण ते टिकेल का? याबाबत शंका आहे. सध्या लागू करण्यात आलेले आरक्षण हे राज्यापर्यंतच आहे. मात्र आम्ही जे हक्काचे आरक्षण मागत आहोत ते केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत लागू होते. त्याच आरक्षणातून मराठा समाजातील तरुण मोठे होणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.
सरकारने लागू केलेल्या आरक्षणाची फक्त दोघा-तिघांची मागणी आहे. १०० ते १५० जणांसाठी लागू होणारे ते आरक्षण आहे. त्यात माझ्या मराठा तरूणांचे काहीही कल्याण होणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. हे आमच्या हक्काचे आरक्षण आहे. सगेसोयऱ्यांचा जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यावर आम्ही ठाम आहोत, अशी भूमीका मनोज जरांगे यांनी मांडली.