‘मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा’; अजित पवारांचे आवाहन
बारामती : अजित पवार यांनी लोकसभेसाठी थेट रणशिंग फुंकलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर अजित पवार यांनी आज (४ फेब्रुवारी) बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका करतानाच बारामतीसाठी मीच उभा आहे असं समजून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन केले. त्यांनी या माध्यमातून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले.
बारामतीमधून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता अजित पवार यांच्या घरामधील उमेदवार असणार की अन्य कोणाचे नाव समोर येणार याबाबत अजून स्पष्टता नसली, तरी अजित पवार गटाकडून बारामतीमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेसाठी सुनिता पवार यांचे नाव चर्चेत आहे. तसं झाल्यास बारामती लोकसभेला नणंद विरुद्ध भावजय असा घरातून संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, आज वातावरण मोदींना संधी द्यावी या पद्धतीनेच आहे. शेती, घरकुल अशा खूप योजना त्यांनी आणल्या आहेत. भारताचे नाव जगामध्ये उंचावले आहे. बारामतीमध्ये कामे मी सरकारमध्ये असल्याने ती कामे होत आहेत. आपल्या विचाराचा खासदार झाल्यास आपली कामं झाली पाहिजेत हे मला सांगता येईल. त्यांनी नुसतं एस म्हटल्यास मोठा निधी मिळतो.
हेही वाचा – ‘मला कुठं माहिती तिकडं कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय’; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर बोचरा वार
आपला खासदार झाल्यावर आपलं रेल्वे स्टेशन कसे करतो बघा असं आश्वासने त्यांनी दिले. आपल्या विचाराचा खासदार असल्यानंतर फरक पडेल. तुम्हाला भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तिकडे अजितला द्या, आता इकडे या असं म्हटलं जाईल. अजित पवारांचे म्हणणे असे आहे की, तिकडे आणि इकडेही अजितला द्या. जर मीठाचा खडा लागाला, तर मी आमदारकीच्या बाबतीत पण विचार करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे काय करायचं ते तुम्ही ठरवा.
दरम्यान यावेळी आपण घेतलेली भूमिका कशी योग्य हे सुद्धा त्यांनी पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते म्हणाले की मी राजकीय भूमिका घेतली आहे. मी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीमध्ये माझे अशा पद्धतीने स्वागत करतील, असे वाटले नव्हते. अनेक मिरवणूक बघितल्या, वरिष्ठांच्या बघितल्या पण असं स्वागत कधी झालं नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर नको नको ते शब्द वापरण्यात आले. मात्र, आपण भूमिका घेतल्यानंतर एक शब्द कोणी बोललं नाही असाही दावा अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना केला. सगळेच भूमिका घेणार होते, हवं तर खासगीत विचारा, असा सुद्धा दावा अजित पवार यांनी केला.