शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल- बच्चू कडू
![When you dare to start school, you have to think - Bachchu Kadu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/bachhu-kadu.jpg)
अमरावती – गेल्या वर्षभरापासून सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. तसेच मागील वर्षापासून शाळाही बंद आहेत. परंतू काही भागात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त गावांमध्ये 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू करण्याच्या शक्यता तपासण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक वक्तव्य केलं आहे.
कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात माणूस महत्वाचा आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल हा प्रश्न सर्वांसमोर असल्याचं त्यांनी सांगितलं.
जे गाव कोरोना मुक्त आहे. त्याठिकाणी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र कोरोना मुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोनाग्रस्त होऊ शकतं त्यामुळे त्याचीही भीती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, 22 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10वी आणि 12वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश दिले होते.