मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत : रावसाहेब दानवे
जालना | ‘ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. परशुराम जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दानवे म्हणाले, ‘जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे.’
येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. विलास नाईक यांनी आभार मानले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, डॉ. संजय राख, भाजपचे भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, दीपक रणनवरे, संजय देठे, रामेश्वर पाटील भांदरगे उपस्थित होते.
मुक्तेश्वरद्वार येथून परशुराम जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळ, ढोलपथकांचा समावेश होता. सकल बहुभाषिक ब्राह्मण समाज पेशवा संघटनेच्या वतीने बालाजी मंदिरासमोर सुमीत कुलकर्णी, अमित कुलकर्णी, गजेंद्र देशमुख यांनी पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील ज्येष्ठांचा सत्कार केला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दीपप्रज्ज्वलन केले.
दरम्यान, जुन्या जालन्यातील कचेरी रोडवरील मशीद समितीच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.