U19 Cricket World Cup: भारतीय महिला संघाची फायनलमध्ये एन्ट्री
![U19 Cricket World Cup: Indian Women's Team Enters Finals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/u19-indian-womens-team-780x470.jpg)
सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडचा ८ विकेट्सने पराभव
मुंबई : भारतीय महिला अंडर-19 संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. भारतीय महिला संघ आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आज सेमिफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ८ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
भारताने नाणेफक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने न्यूझीलंडला सुरूवातीपासूनच धक्के दिले. न्यूझीलंडची अवस्था २ बाद ५ धावा अशी होती. प्लिमेर आणि इसाबेल गाझे यांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंड संघाने भारताला १०८ धावांचे आव्हान दिले. २० षटकांत न्यूझीलंड संघाने ९ बाद १०७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारताने फक्त 14.2 षटकांत 2 गडी गमावून 108 धावांचे माफक लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेट्स व 36 चेंडू राखून जिंकला. भारतीय संघाच्या श्वेता शेरावतने 45 चेंडूमध्ये 61 धावा केल्या. यावेळी तिने एकूण 10 चौकार मारले. सौम्या तिवारीने 26 चेंडूत 23 धावा केल्या. गोलंदाज पार्श्वी चोप्राने 4 षटकात केवळ 20 धावा देत 3 बळी घेतले.
या दमदार विजयासह महिला टी-20 वर्ल्ड कपचा हा पहिला सेमीफायनल सामना भारताने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये भारताची लढत या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भिडणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील विजेत्याशी होणार आहे तर अंतिम सामना रविवारी 29 जानेवारी रोजी होणार आहे.