Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काहीही पाप नाही’; सरन्यायाधीश भूषण गवई

अमरावती : पद मिळाले की अनेकांच्या डोक्यात खुर्ची जाते. या सारखे दुसरे पाप नाही. काही नवोदित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हे चाळीस, पन्नास वर्षे वकिली करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांसोबत ज्या पद्धतीने वागतात, ते चुकीचे असते. एक न्यायाधीश कनिष्ठ वकिलाला इतके रागावून बोलले की तो बिचारा वकील न्यायालयातच बेशुद्ध पडला.

न्यायालयातील वातावरण हे खेळीमेळीचे असले पाहिजे. वकील आणि न्यायाधीश हे न्यायव्यवस्थेची दोन चाके आहेत. दोघेही समान आहेत. वकिलांना वाईट वागणूक देऊन तुमचा अहंकार जपला जात असेल, पण ते तुमचे काम नाही, अशा शब्दात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनेकांचे कान टोचले. दर्यापूर येथील न्यायमंदीर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील, दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धमेंद्र आठवले, जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे. यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचे कार्य करावे. या क्षेत्रात अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याची असावे. शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कायदे लागू केले आहेत. महिला सबळीकरण कायद्यान्वये स्त्रियांना त्यांचा हक्क मिळत आहे. उत्तम न्याय व्यवस्थेमुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे. राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, दर्यापूर येथील न्यायमंदिराचे उद्घाटन ही घटना माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे. मी मूळचा दारापूरचा असल्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची व समाधानाची बाब आहे. मी या कार्यक्रमाला सरन्यायाधीश म्हणून आलो नसून एक ग्रामस्थ म्हणून आलेलो आहे. या नवीन न्यायालयीन इमारतीमुळे तसेच सुसज्ज यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल. न्यायदानाचे कार्य कोणताही पूर्वग्रहदूषित भाव न बाळगता करावे लागते, म्हणून खऱ्या अर्थाने हे एक पवित्र कार्य आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button