राज्यभर गाजलेल्या कोपर्डी प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग
अहमदनगर – कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. हा खटला जलदगतीने चालवण्यात आला असला तरी उच्च न्यायालयात मात्र तो रखडला आहे.मात्र हा खटला काल सोमवारी सुनावणीसाठी येण्याआधीच ही सुनावणी तहकूब करण्यात आली.आता हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव- पाटील यांनी दिली .
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती.मात्र हा खटला तांत्रिक कारणामुळे आपल्यासमोर चालविण्यास दोन्ही न्यायमूर्तींनी नकार दिला.त्यामुळे आता या प्रकरणाची नियमित सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे असे यादव- पाटील यांनी म्हटले आहे. कोरोना येण्यापूर्वी विविध तांत्रिक कारणांमुळे तर कोरोनानंतर लॉकडाऊनमुळे ही सुनावणी लांबली आहे. त्यांनतर आता सरकारतर्फे उच्च न्यायालयात अर्ज करून या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली असताना पुन्हा असा प्रकार घडला आहे.या प्रकरणातील तिन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.