‘तौक्ते’ चक्रीवादळातील बळींची संख्या १३ वर
मुंबई – अरबी समुद्रातील भयानक ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत रविवारी केरळ, कर्नाटकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा दिला होता. त्यानंतर गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळाने सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. तुफान वादळी वारे आणि मुसळधार पावसाने येथील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले. या चक्रीवादळात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. चक्रीवादळाचा कोकणातील ३,५७१ गावांतील दोन लाख २० हजार जणांना फटका बसला असून, आठ हजार ८३० हेक्टरवरील शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागातही घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा कोकणला मोठा फटका बसला होता. त्या धक्क्यातून कोकण सावरत असतानाच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने पावसाळ्याच्या तोंडावर हजारो कुटुंबांना बेघर केले आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ांना बसला आहे. चक्रीवादळात कोकण विभागातील सात जिल्ह्य़ांतील तीन हजार ५७१ गावांतील दोन लाख २० हजार लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण १३ मृतांमध्ये रायगड चार तर ठाणे आणि पालघरमधील प्रत्येकी तीन आणि सिंधुदुर्गमधील दोघांचा समावेश आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही वीजपुरवठा यंत्रणा कोलमडली. ल्ल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातील १०,७५२ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. चार हजार गावे आणि १२ लाख वीजग्राहक अद्याप अंधारात.