राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरेल; टास्क फोर्सचा अंदाज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Corona-Vaccination-Covid-1.jpg)
मुंबई – कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने घेतलेला कडक निर्बंधांचा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. कारण राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आता काहीशी स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल आणि आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या व मृत्यूदर दोन्हीही कमी होतील’, असा अंदाज टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविला आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरू राहायला हवे. त्यातील पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल’, असे टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 71,736 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.