अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजनेची सुप्रिया सुळेंची घोषणा
![Supriya Sule announces 'Nationalist Jeevalag' scheme on the occasion of Ajit Pawar's birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/अजितदादांच्या-वाढदिवसानिमित्त-‘राष्ट्रवादी-जीवलग-योजनेची-सुप्रिया-सुळेंची-घोषणा.jpg)
मुंबई: कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी राष्ट्रवादी जीवलग योजनेची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिवशी जाहीर केली. कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरपलेल्या ४५० ते ४६०मुलांचे पालकत्व महाविकास आघाडी सरकारने स्वीकारले आहे. महाविकास आघाडी सरकारने याबाबतची राष्ट्रवादी जीवलग योजनेंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद केली आहे.
कोरोना महामारीमुळे आई व वडीलांचे छत्र हरपलेले राज्यात जवळपास ४५० ते ४६० बालके आहेत. दोन्ही पालक गमावल्यामुळे या मुलांचे भविष्य अंधकारमय होते की काय, अशी भीती होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली. आर्थिक मदत मिळत असली तरी आपल्या जवळच्या व्यक्तिचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी जीवलग उपक्रम राबविण्यात येणार असून ४५० ‘राष्ट्रवादी सेवा दूत’ या माध्यमातून या मुलांचे पालक बनणार आहेत.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आई-वडीलांचे प्रेम इतर कुणीही देऊ शकत नाहीत. आता पालकत्व गमावलेली मुले नातेवाईंकाकडे राहत आहेत. या नातेवाईकांची रितसर परवानगी घेऊन, जिल्हा प्रशासनाला याची माहिती देऊन आणि सर्वसमंती नंतरच सदर सेवा दूत त्या कुटुंबाशी आणि मुलाशी जोडला जाईल. या काळात सरकारी योजनांचा लाभ संबंधित मुला-मुलीला मिळवून देणे, शिक्षण, आरोग्य अशा बाबींमध्ये काही अडचण आल्यास मदत करण्याचे काम राष्ट्रवादीचे सेवा दूत करतील. असे त्या म्हणाल्या आहेत.