…तर उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील, विनायक राऊतांचा घणाघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/vinayak-raut-4.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पन्नास खोक्यांवरून रवी राणा (MLA Ravi Rana) आणि बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांना अल्टिमेटम दिला आहे. रवी राणा यांनी खोक्यांविषयी पुरावा दिला नाही तर राज्यातील राजकारण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. रवी राणा हे अपक्ष आमदार असले तरी त्यांचा भाजपाला पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावरूनच ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज बच्चू कडू आणि रवी राणा हे भांडत आहेत. तर उद्या भाजप आणि शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटात सर्वच स्वार्थासाठी गेले होते. मात्र आता त्यांचा तिथे अपेक्षाभंग झाला आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
रवी राणा यांनी पुरावे दिले नाही तर एक तारखेला आम्ही सात ते आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ असा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला. यावरून राष्ट्रवादीने भाजपावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच्या मागे असलेले ते सात ते आठ आमदार फडणवीस यांनीच उभे केले आहेत, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
बच्चू कडू हे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.