‘शिवसेना आता घराघरापर्यंत पोहोचली’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध नागरी व सामाजिक कल्याण मोहिमांची घोषणा केली. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली असून, चांदा ते बांदा शिवसेना आता घराघरापर्यंत पोहोचली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राम मंदिर उभारले जावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये 302 कलम हटवले जावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही स्वप्नांची पूर्तता केली आहे. शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाचा आढावा घेत सांगितले की, 29 महापालिका आणि 394 नगरपालिकांमध्ये आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, महिला बचत गट सक्षम करणे, प्लास्टिक मुक्त गडकिल्ले मोहिम अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नगरविकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा –बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा थरार
ते म्हणाले, “बाळासाहेब हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. आरोग्य आपल्या दारी असे अभियान आम्ही राबवत आहोत. सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नागरिक कल्याणासाठी हे उपक्रम राबवले जात आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला नेहमीच सन्मान मिळाला आहे.”
शिंदे यांनी महापालिका निवडणुकीतील युतीच्या कामगिरीवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली, उल्हासनगरसह अनेक महापालिकांमध्ये युतीची सत्ता मिळाली आहे. कल्याण-डोबिंवली महापालिकेबद्दल बोलायचे झाले, तर महायुतीसोबत मनसेही आमच्यासोबत आहे. बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्न पाहणे चुकीचे आहे. विकासाच्या मुद्द्यामध्ये मनसेने आम्हाला साथ दिली आहे.”




