‘हिंदी भाषेला मराठी भाषेच्या आधी ओळख मिळाली’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य

Avimukteshwaranand Saraswati | शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी हिंदी आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदी भाषेला मराठी भाषेच्या आधी ओळख मिळाली आहे. महाराष्ट्र तेव्हा अस्तित्वातही नव्हता असं विधान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं आहे. एवढंच नाही तर भगवा दहशतवाद या शब्दावर आणि देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसवरही अविमुक्तेश्वरानंद यांनी भाष्य केलं आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, की हिंदी भाषेला कधी ओळख मिळाली? मराठीला ओळख कधी मिळाली याचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हिंदी भाषेला आपल्या देशात राजभाषा म्हणून आधी ओळख मिळाली आहे. १९६० मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा म्हणून ओळख मिळाली.
हेही वाचा : सैन्यदलाच्या कारवाईला मोठं यश, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन सखलद्वारे आणखी दोन अतिरेकी ठार
ज्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली त्यांचे अनुयायी काहीही बोलतात. देशाचे दोन तुकडे ज्यांच्यामुळे झाले ते आम्ही नाही. हिंदू कधीही वाटण्याच्या गोष्टी करत नाही. तो एकोप्याने राहतो. आमच्यामुळे देशाचे तुकडे झालेले नाहीत, असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
दहशतवादाला कुठलाही रंग किंवा धर्म नसतो. दहशतवादी हा दहशतवादी असतो. भगवा दहशतवादी असेल तर काय पूजा करणार का त्याची? रंगाचा आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशक्ती दाखवायला हवी. मुंबईत स्फोट झाले दहशतवादी सापडलेले नाहीत. मालेगावच्या स्फोटातले आरोपी सापडलेले नाहीत. दहशतवादाला रंग नसतो, विविध रंगी आयुष्य असतं. दहशतवादाला रंग नसतो रंगाचा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.





