रत्नागिरी जिल्ह्याला सौम्य भूकंपाचा धक्का; चिपळूण तालुक्यातील येगाव येथे केंद्र

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दुपारी सुमारे २:१७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात जमिनीखाली असल्याचे समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही.
हेही वाचा – ‘कचरा डेपोमध्ये बांबू लागवड करून ग्रीन फॉरेस्ट क्षेत्र वाढवावे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र काही वेळातच परिस्थिती पूर्ववत झाली आणि नागरिकांमध्ये शांतता प्रस्थापित झाली.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींवर सतत नजर ठेवली जात आहे.





