‘पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं…’; छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाबत एक भाष्य केलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून ते नाराज आहेत कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे.
नाराजी दूर करण्यासाठी सुनील तटकरेंचा तुम्हाला फोन आला होता का? असं विचारलं असता, मला काही कुणाचा फोन वगैरे आलेला नाही असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे. तसंच तुमची नाराजी दूर झाली आहे का? असं विचारताच छगन भुजबळ म्हणाले, “मी नाराज आहे, नाराज आहे असं रोज सांगत बसू का? तसं रोज रोज सांगत राहिलो तर लोक चॅनल पाहणं बंद करतील. तो विषय सोडून द्या.”
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचीही चर्चा रंगली आहे. कारण त्यातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा जवळचा असल्याने धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी होते आहे. याबाबतही छगन भुजबळ यांना विचारलं असता कुणाचंही मंत्रिपद काढून मला मंत्री करु नये असं उत्तर भुजबळ यांनी दिलं आहे. भुजबळ म्हणाले, “कुणाचंही मंत्रिपद काढून मला ते मिळावं अशी अपेक्षा मी जन्मातही केलेली नाही, करणार नाही. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. जी काही चौकशी होईल ती होईल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करायचं ते पाहून घेतील. माझ्यासाठी कसलीही घाई करण्याचं काहीच कारण नाही.”
हेही वाचा – शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान
यानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि शरद पवार तसंच अजित पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. नव्या वर्षात ते एकत्र आलेले दिसावेत अशी इच्छा आहे असंही आशाताई पवार म्हणाल्या. या चर्चांबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “पवार कुटुंब असेल, ठाकरे कुटुंब असेल त्यांनी एकत्र यावं. माझ्या त्यांना शुभेच्छा. हे सगळे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल.”
छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. त्या ठिकाणी या दोघांनी सुरुवातीला एकमेकांशी संवादही साधला नाही मात्र नंतर एक संदेश शरद पवारांनी निमंत्रण पत्रिकेवर लिहिला जो छगन भुजबळ यांनी वाचला. त्या कृतीचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता छगन भुजबळ यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र यावं माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं आहे.





