आता कोकण रेल्वे विजेवर धावणार; प्रवासाचा वेगही वाढणार
![Now Konkan Railway will run on electricity; The speed of travel will also increase](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/konkan-railway.png)
रत्नागिरी | कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून २२ आणि २४ मार्च २०२२ रोजी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर कोकण रेल्वे विजेवर धावणार आहे. यामुळे गाड्यांचाही वेग वाढणार असल्याने कोकण रेल्वेचा प्रवास आणखी जलद होऊन डिझेलच्या खर्चातही बचत होणार आहे, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर ६-७ वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव -थिवी या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी त्यांची तपासणी केली. त्याच्या आधी कारवार-ठोकूर आणि रोहा-रत्नागिरी या टप्प्यांचे विद्युतीकरण झाले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजनावर दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंज चालवली जाते. आता रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा २२ आणि २४ मार्चला त्याची तपासणी करणार आहेत. यासाठी ७ बोगींची विजेवरील विशेष गाडी २१ मार्चला रात्री ११ वाजता सीएसएमटीवरून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद होईल. याशिवाय डिझेलच्या खर्चात कपात होऊन प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे.