‘राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळे बाहेर चालले…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेत सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले.
यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना आपला देश सोडण्याचा इशारा भारताने दिला असून २८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत, अशी चर्चा सुरु होती, त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे. एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार
दरम्यान, भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज (२७ एप्रिल) शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असतील. व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा, असं परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या-सुलट्या बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.