शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नये! मान्सून कोकणात दाखल, पण १५ जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी

मुंबई | नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दक्षिण कोकणात दाखल झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग जमा होऊन विखुरलेल्या स्वरूपाचा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण
किमान १२ जूनपर्यंत उन्हाचा चटका कायम राहणार
दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यापासून तूर्तास सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे.
विजांच्या कडकडाटावेळी घ्यावयाची काळजी
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना नागरिकांनी झाडांखाली, टिनशेडखाली आश्रय घेणे टाळावे. तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.





