राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज..
पुणे : देशभरातील अनेक भागात, शहरांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक गावं जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात पाणी साचला असून सध्या सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. एवढेच नाही तर डोंगराळ भागात दरड कोसळल्याने अनेक महामार्ग आणि रस्ते बंद झाले आहेत. अशातच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवार यांची भेट; उद्धव ठाकरेंनी सांगितलं भेटीमागचं कारण..
तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.