देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
IMD Weather Updates : देशात मान्सूनचं आगमन झाल्यामुळे प्रत्येक राज्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशात काही भागांमध्ये उष्णतेचा कहर वाढत आहे तर काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात आणि उत्तर भारतातील राज्यांना पुढचे काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर याचवेळी, अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ दिसून येते.
- राज्यांमध्ये उष्णतेचा कहर…
दिल्लीत आज ६ जून रोजी किमान तापमान २७ अंशांच्या आसपास तर कमाल तापमान ४२ अंशांच्या आसपास नोंदवलं गंले. तर, आज दिवसभरात दिल्लीत जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातही उन्हाचा तडाखा कायम असेल. यूपीची राजधानी लखनऊमध्ये किमान तापमान २७ अंश आणि कमाल तापमान ४३ अंश असू शकतं. तर महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ०६ आणि ०७ जून रोजी तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ आणि माहे इथेही ५, ६, ७, ८ आणि ९ जून रोजी पाऊस पडू शकतो. केरळनंतर पश्चिम बंगालमध्ये मान्सूनचा पाऊस पडत आहे. त्याच वेळी, ईशान्य भारतातील आसाम आणि कर्नाटकमध्येही हलका ते मध्यम मोसमी पाऊस पडत आहे.
- मान्सूनबाबत हवामान खात्याने काय म्हटलं?
आता लवकरच मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, मुंबईत मान्सून आगमनाची तारीख १० जून देण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.