Maratha Reservation | १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
कोल्हापूर | मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापूरच्या मराठा गोलमेज परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजातील मुलामुलींचा फी परतावा आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याची मागणी करत रविवारी पुण्यात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाच्या मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावे, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, यासह अनेक मागण्यांचा ठराव गोलमेज परिषदेत मंजूर करण्यात आला. गोलमेज परिषदेला राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले. गोलमेज परिषदेचे आमंत्रक आणि मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर १ ऑक्टोबर नंतर राज्यातील १८१ आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.