‘कृषी विभागाचे महाविस्तार – AI अॅप सुरु, शेतकऱ्यांना रिअल टाइममध्ये शेतीची माहिती मिळणार’

मुंबई : यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा जात पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मागील वर्षाचा काळ पाहता कोणते पीक, कुठे करता येईल? या अनुषंगाने बियाणांची उपलब्धतता करण्यात येईल. शेतकऱ्यांनी केंद्राच्या ‘साथी’ पोर्टलची मदत घ्यावी, जेणेकरुन बोगस बियाणांपासून फसवणूक टाळता येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कृषी विभागाने शेतीची माहिती देण्यासाठी एआय आधारित ‘महाविस्तार’ ॲप तयार केले आहे. त्यावर अनेक माहिती उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांना रिअल टाइममध्ये माहिती मिळू शकेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. लवकरच आमचा प्रयत्न आहे की हा Chatbot व्हॉट्सॲपवरदेखील आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार – AI अॅप’चे लोकार्पण केले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध आणि रिअल टाइम कृषी विषयक सल्ला या माध्यमातून देण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘स्थानिक स्वराज्य’साठी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतले’; रोहित पवार
शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला पाहिजे, असे बँकांना सांगितले आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी पतपुरवठा होईल. शेतकऱ्यांकडे सिबिलची मागणी केली तर आम्ही त्या बँकेच्या शाखेवर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकांना दिला आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक झाली. यावेळी जिल्ह्यांचे पालकमंत्री, अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली.
विशेष दुर्गम भागात सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. मागच्या काळात अनेक रोगाचा प्रार्दुभाव पाहायला मिळाला. त्यामुळे कीड व्यवस्थापनबाबत काळजी घेतली जाईल. डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान महाडीबीटी शेतकरी योजनेंतर्गत पात्र शेतकर्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शेतकऱ्यांना अनुदान, मदत आणि इतर फायद्यांचे वितरण सुलभ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेची ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ ही नवी पद्धत लागू केली आहे. या अंतर्गत वर्ष २०२५-२६ साठी प्रथमतः १,५१,३५२ शेतकर्यांची निवड झालेली आहे. त्यांना देण्यात येणारी अंदाजित देय अनुदान रक्कम ८३९.५५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.